Thursday, January 2, 2014

मागोवा 2013

२०१३ मध्ये अनेक मोठमोठ्या घटना घटल्या. मग ती राजकारणातील किंवा मग क्रीडा जगतातील का सिने जगतातील असो, सर्वच काहीशे अनपेक्षित होते.

इंग्रजी दिनदर्शिकेनुसार सरत्या वर्षाला निरोप देतांना वर्षातील 

मोठ्या-छोट्या, बऱ्या-वाईट, कडू-गोड अश्या काही आठवणी वजा 

गोष्टींचा या सदरात आपण मागोवा घेणार आहोत.

राजकारण

वाह... १३ क्या कहना.....!!

यूपीए २ च्या सरकारचे घोटाळ्यांचे सत्र यावर्षीही चालूच होते. सोशल मीडिया च्या माध्यमातून आपली प्रतिमा कशी उजाळू शकतो याचा प्रत्यय यावर्षी आला. याचा वापर करून जिथे “आप” ने सत्ता काबीज केली. तेथे मोदींनीही याचा आपल्या प्रचारासाठी पुरेपूर वापर केलेला दिसतो. पक्षांतर्गत कलह आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी कसा पुढे यातच सारे गुंतलेले होते. नुकत्याच झालेल्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनी जिथे मोदींना पुन्हा एकदा अधोरेखित केले तिथेच राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले. या निवडणुकीत तेथील सरकारने केलेली विकास कार्य हा प्रमुख मुद्दा होता. परंतु ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशीच होती.

“आप” चा उदय

२०११ साली अन्नाच्या आंदोलनात असलेले केजरीवाल आणि सहकारी दोन वर्षात दिल्लीच्या तख्तावर येतील याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. पण जनता जनार्दनाच्या मताने आणि काँग्रेसविरोधी लाटेने त्यांना सत्ता मिळवून दिली. काँग्रेसच्या “आम आदमी” लाच हायजॅक करून केजरीवाल यांनी “आप”ली सरकार दिल्लीत निवडून आणली. “जेपीं” च्या आंदोलनात जी ताकद होती त्याची तुलना याच्याशी केली गेली. पण ती काहीशी जमत नाही असे वाटते. म्हणतात “परिवर्तन संसार का नियम है” याप्रमाणेच जनतेने परिवर्तन या निवडणुकीतही घडवून आणले. “विकासाला मत” मिळते हे या निकालांवरून दिसून गेले.

याचबरोबर केंद्र सरकार मुदतपूर्व निवडणुका घेणार याचीही चर्चा झाली पण ती हवेतच विरली. भ्रष्टाचारमुक्त भारतापेक्षा सरकार आपल्या मंत्रिमंडळाचा चेहरा हा साफ असावा यासाठीच केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करीत होते. निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक पक्ष तयारीला लागतो त्याप्रमाणे तिसरा मोर्चा सुद्धा तयारीत आलेला यावेळी दिसून आला. पण नेहमीप्रमाणे त्यातही गट-तट निर्माण झाले. 

असो निवडणुकीला अजून काही महिने अवकाश आहे. तेव्हा चित्र कदाचित वेगळेही असू शकेल. पण “कठीण समय येत कोण कामास येतो” या उक्तीची आठवण तेव्हा प्रत्येक पक्षाला नक्की होईल.

वर्षाच्या शेवटी “दुसरे गांधी” म्हणजेच नेल्सन मंडेला यांचे निधन झाले. “लोकपाल बिल” कित्येक वर्षांनंतर पास झाले. ३७७ बद्दल आलेला न्यायालयाचा निर्णय आणि महिला बँक उभारणीस सुरवात यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल.

यावर्षी भारतात ८ पत्रकारांची हत्या झाली. ही फारच दुर्दैवी गोष्ट आहे. माध्यम हे आत्ता उत्पादन बनले आहे, असेच वाटते. केवळ ब्रेकिंग द्यायची म्हणून बातमीची शहानिशा न करता बातमी माध्यमांनी देऊ नये एवढीच अपेक्षा !!
---------------------------------------------------------------------------------
क्रीडाजगत

क्रिकेट हा जसा भारतीयांचा धर्म आहे तसाच “सचिन” हा क्रिकेटचा देव ! यावर्षी या क्रिकेटच्या देवाने आपली क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. विक्रमादित्य सचिनला चाहत्यांनी भावपूर्ण निरोप दिला. भारताची एक नवीन फुलराणीचा उदय यावर्षी झाला. ती म्हणजे “पी. व्ही. सिंधू”. ६४ घरांचा राजा विश्वनाथन आनंद आणि जगज्जेता यावर्षीच त्याच्या सिंहासनावरून पायउतार झाला, तर कार्लसन नवीन राजा बनला.

सचिन, द्रविड, लक्ष्मण, गांगुली यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेटसाठी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचा उदय यावर्षीच क्रीडारसिकांनी अनुभवला. यावर्षीच रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सचिन, सेहवागनंतर तिसरा भारतीय ठरला.

नाशिकबद्दल बोलायचे झाले तर धावपटू अंजना ठमके, तेजस्विनी जाधव, जलतरणपटू प्रसाद खैरनार यांचा नामोल्लेख करणे क्रमप्राप्तच आहे. यांनी यावर्षी आपल्या खेळप्रकारात उल्लेखनीय कामगिरी बजावली.

जसे काही चांगले क्रीडाजगतात झाले त्याप्रमाणे बरेच वाईटही घटले. आयपीएल सामना फिक्सिंग प्रकरणातील दोषी खेळाडूंनी पूर्ण क्रीडा जगताला आणि भारतीयांना मान खाली करायला लावली. त्यांना त्याचा परतावा न्यायालयाने दिलाच. यासोबतच श्रीनिवासन यांची एकाधिकारशाही हाही चर्चेचा विषय होता. 

राजकारण आणि क्रिकेट पुन्हा एकमेकांसमोर उभे राहिले होते. माध्यमांनी नेहमीप्रमाणे आपली पोळी शेकली आणि टीआरपी मिळवली. भारतात अजूनही काही महत्वाचे खेळ आणि त्यातील मुद्दे दुर्लक्षितच असून त्यांना पुढे आणण्यासाठी खरे प्रयत्न व्हायला हवेत हीच अपेक्षा!
---------------------------------------------------------------------------------
सिनेजगत

रेस २ ते धूम ३ : कोट्यावधीची कमाई

आशियातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री भारतात आहे. त्यातून यावर्षीही लगातार सिनेमांची बरसातच झाली. नेहमीप्रमाणे काही आले आणि गेले कळलेही नाही, तर काही अजूनही सिनेप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहेत. तशी सुरुवात एका सिक्वेल झाली. तो म्हणजे सैफ-जॉन चा रेस २, सुंदर कथानक आणि ताबडतोड घडामोडी यामुळे हा चित्रपट २०१३ तील पहिला हिट ठरला. 

यानंतर काही बिग बजेट सिनेमेही आलेत पण ते रसिकांनी नाकारले. यावर्षी कमाईच्या बाबतीत कोटींच्या घरात तब्बल ६ सिनेमांनी स्थान पटकाविले. रेस २, ये जवानी है दिवानी, ग्र्यांड मस्ती, चेन्नई एक्स्प्रेस, क्रिश ३, धूम ३, रामलीला यांचे नाव प्रामुख्याने घेता येईल. काही लो बजेट सिनेमेही प्रेक्षकांना भावलेत. स्पेशल २६, फुक्रे, लंच बॉक्स, आशिकी २, आर. राजकुमार हे त्यापैकी काही नावे आहेत.

मराठी सिनेजगतातही यावेळी चांगले आणि दर्जेदार चित्रपट साकारले गेलेत. दुनियादारी, ७२ मैल एक प्रवास, श्रीमंत दामोदरपंत, नारोबाची वाडी, मंगलाष्टक वन्समोअर, प्रेम प्रेम .... म्हणजे, मात, टाईम प्लीज, लग्न पाहावे करून यांचा उल्लेख करता येईल. मराठीतही यावेळी कोटींची कमाई चित्रपट करू शकतात हे चित्रपटांनी दाखवून दिले.

सिनेजगतातील काही दिग्गज आपल्याला या वर्षी सोडून गेलेत. प्राण साहब, शन्नाजी नवरे, मन्ना डे, सतीशजी तारे, राजीवजी पाटील आणि वर्षाच्या शेवटी विनय सर आपटे आणि फारुख शेख यांची मनाला चटका लावून जाणारी एक्झिट. 

म्हणतात न “जिना यहा मरना यहा – इसके सिवा जाना कहा, कल खेलमे हम हो न हो  - गर्दिश मी तारे रहेंगे सदा” याप्रमाणेच या दिग्गजांना आणि अजून ज्यांचा उल्लेख येथे केला नाही असे तारकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
---------------------------------------------------------------------------------

२०१३ मध्ये बरेच प्रश्न, विधेयक यावर्षी राहून गेलेत म्हणून त्यासाठी २०१४ उजाडले आहे. खरेतर २०१४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष म्हणून ओळखले जाणार, तेथेच नाशिकच्या दृष्टीने सिंहस्थाची तयारी यावर्षी महत्वाची ठरेल.

खरा मुद्दा आणि चर्चा राहील ती हीच की लोकसभेत “नमो” मंत्राची जादू चालणार का “राहुल हे युवराज” ठरणार ? का मग एनवेळेस “प्रियांका गांधी-वढेरा” यांना “हुकुमी एक्का” म्हणून काँग्रेस मैदानात आणणार ? आत्ताच “आप” ने मिळवलेले यश लोकसभेत कोणाला त्रासदायक ठरेल हे पाहणेही महत्वाचे आहे, तर एकीकडे तिसरा मोर्चामधील नेतेमंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार बसलीत. दिल्लीवर कोण स्वारी करणार ह्याचे चित्र लवकर स्पष्ट होईलच.
पाहूया काय होते ते......पुन्हा भेटूया.

No comments:

Post a Comment